रब्बी पिके योग्य वेळी काढा, नुकसान टाळा! जाणून घ्या काढणीसाठी सर्वोत्तम वेळ
पीक उत्पादनाच्या दृष्टीने कुठल्याही पिकाच्या पेरणीला जेवढे महत्त्व
असते, तेवढेच महत्त्व पिकाच्या काढणीलाही असते. पक्वतेनंतर योग्य कालावधीत पिकाची काढणी केली नाही तर नुकसान होऊन पिकाचे अपेक्षित उत्पादन (Crop Production) मिळत नाही.
- रब्बी ज्वारीचे पीक (Jwari Crop) जातीपरत्वे ११० ते १३० दिवसात काढणीस तयार होते. काढणीच्यावेळी कणसातील दाणे टणक होतात, दाणे खाऊन पाहिल्यास फुटताना टच असा आवाज येतो आणि ज्वारी पिठाळ लागते. दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो. ही लक्षणे दिसतात ज्वारीची काढणी करावी.
- गव्हाचे पीक पक्व होण्याच्या २ ते ३ दिवस अगोदर काढणी करावी. कापणीस उशीर झाल्यास एनआय-५४३९ व एनआयएडब्ल्यू-३०१ (त्र्यंबक) या गव्हाच्या वाणांचे दाणे शेतात झडू शकतात. गव्हाच्या कापणीच्यावेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण सुमारे १५ टक्के असावे.
- मक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यावर कणसे सोलून खुडून घ्यावीत.
- हरभऱ्याचे पीक ११० ते १२० दिवसात काढणीसाठी तयार होते. मात्र पीक ओलसर असताना हरभऱ्याचीकाढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करावी.
- सूर्यफुलाची पाने, देठ व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर कापणी करावी. कणसे कापणीनंतर चांगली वाळवून नंतरच त्यांची मळणी करावी.
- करडईचे पीक १३० ते १३५ दिवसात पक्व होते, पाने व बोंडे पिवळी पडतात. करडईची काढणी शक्यतो सकाळी लवकर करावी कारण हवेत आर्द्रता असल्याने दाणे गळत नाहीत तसेच हाताला काटे बोचत नाहीत. कापणीनंतर झाडांची कडपे रचून पेठे करावीत व ते पूर्ण वाळल्यानंतर काठीने बडवून काढावेत.
हे पण वाचा : महाशिवरात्रीला घरोघरी का खातात कवठ? त्याचे आरोग्यदायी फायदे