आंब्याच्या बाजारभावात 30 ते 40 टक्के दरवाढ!
आंब्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. नागपूरच्या कळमना फळ बाजारात आंब्याच्या दरात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या आंबा (Mango) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) चांगले दिवस आले आहेत. कारण आंब्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. नागपूरच्या कळमना फळ बाजारात आंब्याच्या दरात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दक्षिणेकडून येणाऱ्या आंब्याची किंमत 40 रुपये प्रति किलो इतकी होती. यंदा आवक कमी झाल्यामुळे त्याच आंब्याचे दर प्रति किलो 60 ते 70 रुपयांवर गेले आहेत.
अवकाळी पावसामुळं आंब्याचं मोठं नुकसान
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आंबा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून नागपूरला आंब्याची आवक होते. या भागातील अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाती आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस
विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. याठिकाणी लिंबू, आंबा, तसेच भाजीपाला, केळी पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या वर्षीचे पीक आधीच हवामान बदलामुळे प्रभावित झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी मिळाले. अशातच पुन्हा अवकाळी पावसानं तडाखा दिल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आंब्याच्या उत्पादनात आघाडीची राज्ये कोणती आहेत?
देशाच्या अनेक भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पहिल्या पाच राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. देशातील एकूण आंब्याच्या उत्पादनात या पाच राज्यांचा वाटा 65 टक्के आहे. याचा अर्थ आंब्याच्या उत्पादनापैकी केवळ 35 टक्के उत्पादन इतर राज्यांमध्ये होते. महाराष्ट्रात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. कोकण विभाग आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. दरम्यान, पहिल्या पाच राज्यात महाराष्ट्राचा नंबर लागत नाही. आंबा हा आरोग्याच्या दृष्टीनं देखील खूप फायदेशीर आहे. आंब्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्ते असतात. त्यामुळं आंब्याच्या हंगामात आहारात मोठ्या प्रमाणात आंब्याचा वापर केला जातो.