अवकाळीचा जोर आणखी किती दिवस राहणार? पंजाबराव डखांचा हवामान अंदाज काय?
राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं चित्र पाहयला मिळत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर काही भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांना चांगलाच फटका बसलाय. दरम्यान, अवकाळी पावसाचे वातावरण (Climate Chnage) आणखी किती दिवस राहणार? राज्यातील हवामानाची स्थिती काय असणार याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिलीय. राज्यात 18 एप्रिल पर्यंत म्हणजे पुढील पाच दिवस पावसाची शक्यता कायम राहणार असल्याची माहिती डख यांनी दिलीय.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात पावसाची शक्यता कायम
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 18 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता डखांनी व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यात देखील 18 एप्रिलपर्यंत वातावरण बिघडलेले राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
दरम्यान, 18 एप्रिलपर्यंतच्या या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार वादळी वारे वाहतील अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. या काळात वादळी वाऱ्यासह पाऊसही होणार आहे. या कालावधीत बरसणारा पाऊस हा सर्वदूर होणार नाही, मात्र काही-काही भागात पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे. कांदा, हळद तसेच इत्यादी हार्वेस्टिंग झालेला शेतमाल झाकून ठेवावा अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसामुळं शेती पिकांना फटका
सध्या मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आंबा, लिंबू, केळीच्या बागा, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झालीय. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या उन्हाळ्याच्या काळात अवकाळी पाववसाचा जोर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. अशातच आणखी पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा पपंजाबराव डखांनी दिला आहे.